Friday, 18 October 2019

भारतीयदर्शन-परिचय : अद्वैत वेदांत (भाग २).

भारतीयदर्शन-परिचय : अद्वैत वेदांत (भाग २)

आपल्या शिष्यांसह यतीराज मंडनमिश्र यांच्या माहिष्मती नगरीकडे निघाले।आद्य शंकराचार्यांची चरित्रे लिहिणाऱ्यांनी फार सुंदर प्रतिकांचा वापर करून मंडनमिश्र यांचा महिमा सांगितला आहे.

आचार्य एका पाणवठ्यावर विचारतात,मंडनमिश्र कुठे रहातात?त्यावर पाणी भरणारे पाणके सांगतात,'यतीवर, 
ज्या घरात पोपट आणि मैना यांचे संभाषण सुरू असेल,""वेद स्वप्रमाणित आहेत की नाहीत?कर्माचे फळ कर्मसिद्धांत देतो की ईश्वर?जग नित्य की अनित्य"असे  घर मंडनमिश्रांचे समजावे!!

  त्यांची आणि आचार्यांची भेट,संभाषण हे सारेच चरित्रकारांनी कौशल्याने रंगवले आहे!

  परन्तु आपला विषय दर्शन असल्याने आपण या स्थानी त्यास सामावून घेऊ शकणार नाही।पण ते सर्व हृदयाला आल्हाद देणारे व रंजक आहे!!

 मंडनमिश्र यांना भेटून आचार्य त्यांना कुमारिलांची शेवटची वाणी सांगतात व शास्त्रार्थाची इच्छा प्रकट करतात.मंडनमिश्र यांच्या पत्नी उभयभारती यांनी निर्णय द्यावा असे ठरते।

   वादाची अट होती जो हरेल त्याने विजेत्याचे मत स्वीकारावे!

 मंडनमिश्र हे विशुद्ध कर्मवादी  ,ईश्वर न मानणारे असे वैदिक आचार्य होते तर  आचार्यशंकर हे ज्ञान कर्म आणि उपासनेसह अद्वैत ब्रह्माचे प्रतिपादक होते!

वेदांचे तात्पर्य काय?हा शास्त्रार्थ बिंदू ठरला!

दुसऱ्या दिवशी गहन पंडित्याने भरलेला वाद सुरू झाला!उभयभारती निर्णायक पदी बसल्या!

     
आचार्य शंकर:::

अद्वैत ब्रह्म हेच वेदांचे एकमेव तात्पर्य आहे.कर्म आणि उपासना ही केवळ चित्तशुद्धीची साधने आहेत.त्यामुळे ज्ञान आणि कर्म/ज्ञान आणि उपासना यांचा समुच्चय साधणे मुळात अशक्य आहे.ज्याला मुक्ती मिळवायची असेल त्याने कर्म व उपासनेने चित्तशुद्धी करावी ।नंतर त्याला अहं ब्रह्मास्मि हे ज्ञान स्वाभाविकपणे लाभते।नुसत्या कर्मकांड व उपासनेने प्रत्यक्ष मुक्ती मिळत नाही."

मंडनमिश्र::;:

कर्म हेच वेदांचे तात्पर्य आहे.कर्मामुळे जीवाला अनंत मुक्ती मिळते.ब्रह्म व आत्मा यांच्यात अभेदभावना करण्याविषयी वेदात सांगितले आहे ;; ते कर्म उत्तमपणे साधता यावे म्हणूनच!अनंत काल पर्यंत केवळ कर्म करीत राहिले तरी स्वर्गप्राप्ती होते.कर्माने इष्ट सिद्धी होत असेल तर ज्ञानाचे काय विषेश??"

 अशा रीतीने ब्राह्ममुहूर्तावर सुरू झालेले हे वाक् युद्ध सुरूच राहिले.दुपारी उभयभारती म्हणाल्या ,"तुमचे चालू द्या।मी दुरून ऐकते।मला पतीदेव व अतिथी यांच्यासाठी अन्न तयार केले पाहिजे!"

अशा प्रकारे हा वाद आठ दिवस सुरू राहिला.आचार्य शंकर बोलू लागले की वाटत असे हे तर्कशुद्ध विधान खोडता येणार नाही.पण मंडनमिश्र आपल्या धारधार बुद्धीने ते परतवून लावत!

शेवटचा दिवस उजाडला।

आचार्य शंकर:: 

स्वकल्याणाची इच्छा धरणाऱ्या मनुष्याने कर्मांनी प्राप्त होणाऱ्या सर्व लोकांचे नीट परीक्षण करावे.विवेक करावा व त्यांतील सुखांची अनित्यता लक्षात घेऊन त्यांच्या विषयी विरक्त व्हावे.

अकृत वा नित्य अशा मोक्षाची प्राप्ती कृत कर्माने कधीही होऊ शकत नाही.

मोक्ष हे आत्म्याचे स्वरूपच असून तो तिन्हीत्रिकाल विद्यमान आहे.कोणत्याही कर्माने तो उत्त्पन्न होत नाही.मात्र कर्मामुळे स्वर्गादी फळे मिळतात,त्यांचा वियोगही घडतो।या प्रमाणांवरून कर्माची(वेदोक्त कर्मकांडे)निकृष्ठता दिसते परन्तु वेदांमध्ये ज्ञानाला निकृष्ट मानणारे एकही विधान नाही.यावर तुमचे काय म्हणणे आहे?''

या नंतर मंडनमिश्र यांनी आचार्यांचे चरण धरले व उभयभारती यांनी आचार्य शंकर जिंकल्याचे घोषित केले!

*काही चरित्रग्रंथात आचार्यांनी परकाया प्रवेश करून कामशास्त्राचे ज्ञान मिळवले आदी उल्लेख आहेत.परन्तु येथे अद्वैत वेदांतावर वार्तिक लिहू शकणारी व्यक्ती आचार्यांना मिळाली हे महत्वाचे!!

(क्रमशः)

डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.

1 comment:

  1. साधु साधु! अप्रतिम लेखमाला!!

    ReplyDelete

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र हे शरणागत भाव दर्शवणारे अत्यंत भावगर्भ आणि स...