Sunday, 20 October 2019

भारतीयदर्शन-परिचय : अद्वैत वेदांत (भाग ३)

भारतीयदर्शन-परिचय : अद्वैत वेदांत (भाग ३)


अद्वैत वेदांताला उत्तरमीमांसा असेही म्हटले जाते.
उपनिषदे,ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता यांना वेदांताची प्रस्थानत्रयी म्हटले जाते.प्रस्थान म्हणजे उगम,सुरुवात !ब्रह्मसूत्रे आचार्य बादरायण यांनी रचली आहेत.त्यावर भाष्य लिहिणाऱ्यास आचार्य म्हटले जाते.  

वेदांताचे प्रमुख आचार्यांची नावे सोबतच्या छायाचित्रात कालखंडासह दिली आहेत.

या सर्व मतांत लोकमान्य विचार हा शंकराचार्यांचा अद्वैतवाद आहे.येथे त्यातीलच तत्वज्ञान आपण पहाणार आहोत.
वेदांत शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम छान्दोग्य उपनिषदात येतो.वेदांच्या शेवटी येणारा भाग,उपनिषद अशा अर्थाने.

उपनिषदांतील वाक्यांची मीमांसा करून त्यांचा समन्वय बादरायण आचार्यांनी केला.त्या अर्थाने ज्या दर्शनास उपनिषद प्रमाण आहे त्यास वेदांत अशी संज्ञा मिळाली.

     
 ^ ज्यांना वेदांत दर्शनाला अनुसरून साधना करावयाची आहे त्यांच्यासाठी पुढील निकष शास्त्रात सांगितले आहेत।

१.स्वाध्याय -

चार वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांचा सम्यक अभ्यास झालेला असावा. सहा वेदांगे माहिती असावीत.ही सहा वेदांगे पुढीलप्रमाणे--शिक्षा,कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद, जोतिष।या साहित्याचे परिशीलन केल्यानंतरच वेदांताची साधना करावी.

२.काम्य आणि निषिद्ध कर्मांचा त्याग -

काम्य कर्मे म्हणजे जमीन,जुमला,सोने नाणे,स्वर्गाची कामना यासाठी केली जाणारी आटाआटी,विविध यज्ञाचे आयोजन इ होय.आणि निषिद्ध कर्मे म्हणजे गोहत्या,व्यवहारात फसवणे इ सारखी कामे होत.त्यांचा सर्वथा त्याग करणे आवश्यक आहे.

३.नित्य आणि नैमित्तिक कर्मांचे अनुपालन -

नित्य कर्मे म्हणजे स्नान,संध्या,भजन,पूजन ,वैश्वदेवइत्यादी होय.हे करीत गेल्याने पुण्य मिळत नाही परंतु न केल्याने  
हानी होते.
नैमित्तिक कर्मे म्हणजे सोळा संस्कारातील कर्मे होय.जसे जात्येष्टि,नामकरण इ.जे काही निमित्ताने केली जातात.
यांतच काही चुकल्यास प्राय:श्चित्त कर्माचाही उपयोग केला जातो.उदाहरणार्थ चंद्रायण व्रत इ.

४.साधनचतुष्टय  -

ज्याला वेदांत दर्शनाची साधना करून मोक्षप्राप्ती हवी आहे, त्याला चार साधने संपत्तीप्रमाणे जतन करावी लागतात.याला अनुष्ठान असे म्हणतात..ती पुढीलप्रमाणे आहेत.

अ--नित्यानित्यवस्तुविवेक--

 साधकाला ब्रह्म ही नित्य वस्तू आहे आणि अन्य सर्व अनित्य आहे हे सतत लक्षात ठेवले पाहिजे.यातच शुद्ध अशुद्ध विवेक,आत्म अनात्म विवेक,श्रेयस प्रेयस विवेक यांचाही समावेश होतो.थोडक्यात नाशवंत आणि परिवर्तनशील बाबी सतत ओळखणे आणि अविनाशी तत्वाला शोधत रहाणे हे पहिले साधन आहे

आ--इह परलोक सुखभोग विराग-

पृथ्वीवरील सुखे आणि अन्यलोकांत मिळणारी सुखे ही दुःखमूलक आहेत असे लक्षात घेऊन त्या विषयी विरक्त राहणे.

इ-शमदमादि साधन संपद् - 

साधकाने सहा संपदा मिळवायच्या आहेत.शम,दम,उपरती,
तितिक्षा ,समाधान,व श्रद्धा!!

शम म्हणजे मनाचा  इंद्रियांच्या प्रवृत्तीवर आतून ठेवलेला निग्रह,दम म्हणजे इंद्रियांवर बाहेरून नियंत्रण ,उपरती म्हणजे विधिवत संन्यास घेणे,तितीक्षा म्हणजे शारीरिक व मानसिक द्वन्द्व प्रतिक्रीया न देता सहन करणे,समाधान म्हणजे चित्त एकाग्र ,स्थिर करणे आणि श्रद्धा म्हणजे वेदांत विचारांवर निष्ठा असणे होय.

ई- मुमुक्षुत्व-

मोक्षाची अनिवार इच्छा!

या नंतर साधकास श्रवण,मनन आणि निदिध्यास करण्याची योग्यता प्राप्त होते.
अहं ब्रह्मास्मि,तत्त्वमसि, जीवो ब्रम्हैवनापर: ,जग्न्मीथ्या या सारख्या उपनिषद वाक्यांचे श्रवण मनन निदिध्यास करण्यात येतो.गुरुकृपे नंतर ब्रह्मसाक्षात्कार होतो.

ब्रह्म,माया,जीव या संकल्पनांचा ऊहापोह पुढील भागात!

(क्रमशः)

डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.

No comments:

Post a Comment

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र हे शरणागत भाव दर्शवणारे अत्यंत भावगर्भ आणि स...