Tuesday, 15 October 2019

वरदवाणी (५)


वरदवाणी (५)🚩

हिंदू धर्म समजून घ्या -

एक वृद्ध गृहस्थ होते ते पुन्हा पुन्हा आजारी पडायचे. डॉक्टरकडे जाऊन औषध घेतले की तेवढ्यापुरते त्यांना बरे वाटायचे. म्हणून ते एकदा नुकत्याच,अमेरिकेतील पदवी घेऊन आलेल्या डॉक्टरकडे गेले, व म्हणाले,  'मला औषध घेतले की तेवढ्यापुरते बरे वाटते, नाही घेतले तर मी पुन्हा आजारी पडतो. हे असे का होते सांगाल का? तुम्ही परदेशात शिकून नुकतेच परत आलेले आहात. तेथील वातावरणामुळे तुमचे ज्ञान अद्यापि दुषित झालेले नाही, ताजेताजे आहे, म्हणून तुमच्याकडे आलो. आता तुम्ही तरी योग्य ते सांगाल असा विश्वास आहे.' त्या (इम्पोर्टेड) डॉक्टरांनी त्या वृद्ध गृहस्थाचे पाच-दहा हजार रुपये खर्चून सर्व तपासण्या केल्या आणि मोठ्या गंभीरपणे सांगितले की, 'तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडता याचे कारण तुम्ही जिवंत आहात.' (सर्व श्रोते लोक मोठ्याने हसतात) मला सांगा का हसलात? डॉक्टरच्या या विधानात खोटे काहीच नाही. मेलेला मनुष्य कधी आजारी पडतच नाही. तो जिवंत असतो म्हणूनच आजारी पडतो. यावर उपाय म्हणजे त्याला मारुन टाकणे; म्हणजे तो पुन्हा आजारी पडण्याची शक्यताच नाही. हिंदु धर्माविषयी बोलणारे तथाकथित बुद्धिवादी या डॉक्टरच्याच जातीचे आहेत. अरे! आम्ही टिकून आहोत. याचे काही वैशिष्ट्य आहे की नाही? आणि हे केवळ मीच म्हणतो असे नाही तर महमंद इकबाल, जेव्हा त्यांचे डोके ठिकाणावर होते, तेव्हा असेच म्हणत होता.

यूनान, रोम, मिस्र सब मिट गये जहाँसे।
कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी ।।

रोम, मिस्र, युनान गेले. या भूमीवरुन सगळे नाहीसे झाले पण हिंदूचे वैशिष्ट्य आहे की, 'कुछ बात है कि हस्ती मिटती नही हमारी।' याच महमंद इक्बालने म्हटले की "सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा". कारण परदेशामध्ये शंभर-सव्वाशे वर्षांच्या आक्रमणाच्या काळात काही संस्कृती पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. इथे मात्र 

दिने हजाजी का बेबाक बेडा
न जेहूमें ठहरा ना सेहूमें अटका।
किये पार जिसने सातो समंदर
वो डुबा दहाडेमें गंगामें आकर ॥

असे एका हाली नावाच्या मुसलमान कवीनेच वर्णन केले आहे. इंग्रजाने म्हटले, मुसलमानाने म्हटले; असे म्हटले की, ऐकणारांना बरे वाटते. कुणी हिंदू कवीनी संस्कृतात सांगितले आहे, असे म्हटले की तो जातीयवादी ठरण्याची शक्यता आहे. तो मुसलमान कवी हाली म्हणतो
- सगळ्या पृथ्वीवर दौड करणारा आमचा हा घोडा हिंदुस्थानातील गंगेच्या डोहात बुडून गेला.

मुसलमानांचे साम्राज्य सातशे वर्षे असून, औरंगझेब, अल्लाउद्दीन यासारख्या क्रूरतम मुस्लिम राजांनी राज्य करुनही आजही हिंदू बहुसंख्येने टिकून आहेत. "कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी|" आजही रामजन्मभूमीकरता झालेला संघर्ष एवढया मोठ्या प्रमाणावर होईल असे मलाही वाटले नव्हते. विश्व हिंदू परिषदेचे प्रेरणेने मेळावा दिल्लीला भरला तर पंचवीस लाख हिंदू जमा झाले. अगदी खत्रुड वर्तमानपत्रानेही पंधरा लाखाचा आकडा दिला आहे. यासाठीच",कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी" हे मानले पाहिजे.

(क्रमशः)
प.पू.ब्र.स्वामी वरदानंद भारती

No comments:

Post a Comment

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र हे शरणागत भाव दर्शवणारे अत्यंत भावगर्भ आणि स...