Wednesday, 23 October 2019

शांतिपाठ निरूपण



 शांतिपाठ निरूपण 




असतो मा सद्गमयः
तमसो मा ज्योतिर्गमयः 
मृत्योर्मामृतं गमयः 
सर्वेपि सुखिनः सन्तु 
सर्वे सन्तु निरामयः 
सर्वे भद्राणि पश्यन्तु 
मा कश्चित दुखःभात्भ्वेत 
ॐ द्यौः शान्तिः अंतरीक्ष शान्तिः पृथ्वी शान्तिः 
आप शान्तिः रोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिः 
विश्वेदेवः शान्तिः ब्रह्मशान्तिः सर्व शान्तिः 
शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि 
ॐ शान्तिः  शान्तिः शान्तिः

यजुर्वेदातील हा शांती पाठ मंत्र रोज सांयंदीप प्रज्वलन करताना म्हणण्याचा प्रघात आहे. या मंत्राचा
भावार्थ फार सुंदर आहे. 
हे ईश्वरा प्रत्येक जीवात्म्याचा प्रवास हा असत अर्थात असत्याकडून सत्याकडे होऊ दे. जग हे
अशाश्वत आभासमय आहे या सत्याची जाणीव प्रत्येक जीवात्म्याला होऊ दे आणि सत्य आणि
शाश्वत अश्या ब्रह्मतत्वाला जाणण्याची त्याला बुद्धी होऊ दे.  

प्रत्येक जीवात्म्याचा अज्ञानरुपी अंधःकार दूर होऊन त्याला आत्मस्वरूपाची जाणीव होऊ दे.
आपल्या शरीराला तो स्वतःचे अस्तित्व मानतो आहे हे अज्ञान आहे. तो सच्चिदानंद चेतना स्वरूप
आत्मा आहे तो प्रकाशमय आहे हे त्याला उमजू दे. 

अज्ञान हे मृत्यूसमान आहे, मृत्यूकडे नेणारे आहे. ज्ञान शाश्वत आहे चिरकाल टिकणारे आहे.
अमर आहे. याची जाणीव होऊन जीवात्म्याचा प्रवास अज्ञानाकडून ज्ञानाकडे होऊ दे. 

सर्व जीव सुखी व्हावेत, निरोगी व्हावेत, सर्व जीवांचे कल्याण व्हावे या विश्वात दुक्खाचा सामना
करण्याची वेळ कुणावरही न येवो. 

हे परमात्म्या तू शांतीस्वरूप हो. अंतरीक्षा तू शांतीस्वरूप हो. पृथ्वी, जल , वायू, औषध, वनस्पती,
विश्व देव , सर्व देवता गण, ब्रह्म हे सर्व शांती स्वरूप होवो. सर्वत्र शांतता नांदो. चारही दिशांना
शांतता नांदो. परमपिता परमेश्वर शांतीरूप होवो. सर्वत्र केवळ शांती शांती आणि शांती असो. 

संपूर्ण विश्वाचे भले व्हावे हे चिंतणारा हा शांतीपाठ आपण कधीच आपल्या सायंप्रार्थनेतून हद्दपार
केला आहे. जे चिंती परा ते येई घरा अशी म्हण आहे. मग सर्व विश्वाचे भले चिंतणारा हा शांतीपाठ
आपण रोज म्हणू लागलो तर आपल्या घरात सुद्धा शांती नांदेल असा याचा सोपासा अर्थ आहे. 
  
एक छोटीशी पणती. घरात लावली जाणारी. सर्वत्र व्यापलेल्या अंधाराचा ठाव घेणारी. अंधःकारातील
भीतीवर मात करून जगण्याचे बळ देणारी. तिची ज्योत किती तेजस्वी आहे हा मुद्दाच नाही.
अंधाराच्या साम्राज्याला छेद देत अंतःकरणात प्रकाश जागृत करण्याचे काम ती पणती करते.
तिचे कार्य सूर्यापेक्षाही थोर आहे. 

म्हणून आपल्या संस्कृतीत पणती हे ज्ञानाचे, आत्मप्रकाशाचे प्रतिक मानली गेली आहे. अंधःकारमय
निराशाजनक आणि वाईट शक्तींच्या रूपाने व्यापलेल्या विश्वात जगण्याची प्रेरणा देणारी आणि
त्यांच्याशी झुंजण्याचे बळ देणारी पणती हि त्याच अग्नीचे लघुरूप आहे ज्याने मानवाला इतर
प्राण्यांच्या पासून भिन्नत्व प्रदान केले. 

शारीरिक दृष्ट्या दुर्बल असणारा असहाय्य असणारा मानव ज्ञानरुपी पणतीचा वापर करून आज
या पृथ्वीवरील श्रेष्ठ जीव झाला आहे त्या विजीगिषु वृत्तीचे प्रतिक पणती आहे. 

पणती एकटी आहे जसा जीवात्मा या विश्वात एकटा आहे. पणती थोर होईपर्यंत जगाला प्रकाश देत
राहाते. आत्मा शेवटच्या क्षणापर्यंत को अहं चा शोध घेत लढत राहातो. पणती हि मानवाच्या
प्राणशक्ती चे मूर्त रूपक आहे. 

देहली दीप या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. आपले शरीर हे बाह्य विश्व आणि आपला आत्मा हे
अंतर्विश्व. शरीर आणि आत्म्याच्या देहलीवरील उंबऱ्यावर आत्मज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणे तो
देहली दीप. हा आत्मज्ञानाचा दीप सतत प्रज्वलित ठेवला तर आपण अंतर्बाह्य उजळून निघतो.
अंतरीचा ज्ञानदिवा करुया जागृत..

अंतर्बाह्य करुया प्रकाशित........... 

तत्वमसि ब्लॉग आणि मासिकाच्या माध्यमातून आम्ही हा ज्ञानदीप प्रज्वलित करतो आहोत. आपल्या
संस्कृतीतला सगळा सकारात्मक भाग आम्ही सर्वांच्या पर्यंत पोचवण्याचा या निमित्ताने प्रयत्न
करतो आहोत. आपल्या सक्रीय सहकार्याची अपेक्षा आहेच.. 

©सुजीत भोगले. 



No comments:

Post a Comment

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र

सार्थ देवी अपराध क्षमापन स्तोत्र आदि शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र हे शरणागत भाव दर्शवणारे अत्यंत भावगर्भ आणि स...