सार्थ निर्वाणषटक
निर्वाण षटक हे सहा श्लोक आदि शंकराचार्यांनी आपल्या गुरूंच्या दर्शनाला गेल्या नंतर त्यांच्या पुढे
रचून गायले आहेत. हे श्लोक म्हणजे अद्वैत तत्वज्ञानाचे सार आहे. कल्पना करा एक फक्त
१० वर्षाचा बालक. ज्याची असामान्य बुद्धिमत्ता पाहून त्याची ४ त्या वर्षी मुंज केली गेली
ज्याने संपूर्ण वेद, उपनिषदे, आणि तमाम तत्वज्ञानाचा अभ्यास केवळ ४ वर्षात पूर्ण केला जो
त्याकाळी करण्यास किमान १२ वर्षे लागत. वयाच्या ९ व्या वर्षी ज्याने सन्यास घेतला आणि
गुरूच्या शोधात कालडी ( केरळ ) येथून निघाला. १ वर्षाच्या प्रवासानंतर ओमकारेश्वर ( मध्य प्रदेश )
येथे पोचला. तिथे त्याला त्याचे सद्गुरू भेटले ( गोविंद भगवतपाद ) सद्गुरुना भेटल्यावर त्यांनी प्रश्न
केला तू कोण आहेस.. आणि आचार्यांनी हे सुंदर उत्तर दिले.
आता त्याचा अर्थ सांगतो.
मनोबुध्य अहंकार चित्तानि नाहं नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे. |
नच व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपः शिवोहं शिवोहं || १ ||
मी मन नाही मी बुद्धी नाही मी अहंकार नाही आणि चित्त सुद्धा नाही. , मी जीभ, कान , नाक डोळे
या पैकी काहीही नाही. मी आकाश नाही ,पृथ्वी नाही, अग्नी नाही, आणि वायू सुद्धा नाही. मी
सच्चिदानंद रूप शिव स्वरूप जीवात्मा आहे.
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥
मी प्राणस्वरूप श्वास किंव्हा जीवाला आवश्यक असे पंच वायू नाही. मी मानवी शरीर घडवणारे
सात धातू किंव्हा पाच कोश सुद्धा नाही. मी वाणी ( शब्द व्यक्त करणे ) निर्माण करणर अवयव नाही.
मी हालचाल करणारे हातपाय नाही आणि मी त्याज्य पदार्थ शरीराबाहेर टाकणारे अवयव सुद्धा नाही.
मी सच्चिदानंद रूप शिव स्वरूप जीवात्मा आहे.
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥
मी द्वेष राग लोभ मोह मद आणि मात्सर्यं या षड्रिपू किंव्हा सहा मानवी भावनांच्या पासून मुक्त आहे.
( या भावनांच्या स्वरूपात मी व्यक्त होत नाही, माझ्यात या भावना नाहीत ) चार पुरुषार्थ धर्म , अर्थ,
काम, मोक्ष यांच्यापासून सुद्धा मी मुक्त आहे. मी सच्चिदानंद रूप शिव स्वरूप जीवात्मा आहे.
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्
पाप, पुण्य सौख्य आणि दुखः या भावनांच्या पासून मी मुक्त आहे. मला मंत्र ( पवित्र शब्द ) तीर्थ
(पवित्र स्थान ) वेद ( पवित्र ज्ञान ) आणि यज्ञ ( ईश्वराला दिलेली आहुती त्याग ) यांचे बंधन नाही .
भोजन अर्थात अन्न ग्रहण अर्थात आनंद प्राप्ती. मी आनंदाची अनुभूती घेत नाही, मी आनंद देऊ
शकत नाही आणि मी आनंदाचा उपभोग घेणारा सुद्धा नाही . मी सच्चिदानंद रूप शिव स्वरूप
जीवात्मा आहे.
न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्
मला मृत्यूचे अथवा त्याच्या स्वरूपाचे भय नाही. मी जातीभेदापासून सुद्धा मुक्त आहे. मला आई
वडील नाही मी अजन्मा आहे. मला मित्र बंधू गुरु अथवा शिष्य अशी कोणतीच नाती नाहीत.
मी सच्चिदानंद रूप शिव स्वरूप जीवात्मा आहे.
अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् ।
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥६॥
मी निर्विकल्प अर्थात कोणतेही दृश्य शरीर नसणारा, आकारहीन आहे. तरी सुद्धा मी यत्र तत्र सर्वत्र
व्यापून आहे प्रत्येक जीवात्मा त्याच्या इंद्रियांनी माझ्या अस्तित्वाची अनुभूती घेतो आहे. मी कशालासुद्धा
चिकटलो नाही ( कश्याच्या सुद्धा बंधनात नाही ) आणि मी कशापासून मुक्त सुद्धा नाही . मी
सच्चिदानंद रूप शिव स्वरूप जीवात्मा आहे.
अद्वैत तत्वज्ञानानुसार पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक जीवात्मा हा अंशात्मक ब्रह्मस्वरूप आहे.
पण ज्यावेळी तो जीवात्मा जन्म घेतो. त्याला माया वश करते आणि त्याला त्याच्या मूळ स्वरूपाचा
विसर पडतो. परब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. जीवात्मा हा अंशात्मक ब्रह्म असतो पण मूळ स्वरूपाचा
विसर पडल्याने हे शरीर , त्यात असणारे मन , चित्तवृत्ती आणि समाजातील रूढी परंपरा यांनाच तो
स्वतःच्या अस्तित्वाचे कारण समजतो तो या मोहातच गुंतून पडतो आणि आपल्या मूळ स्वरूपाला
जे सच्चिदानंद स्वरूप आनंदमय आहे पूर्णपणे विसरून जातो. निर्वाणषटक अथवा आत्मषटक हे
जीवात्म्याला त्याच्या मुल स्वरुपाची जाणीव करून देण्यासाठी रचले गेले आहे. याचे पठन अथवा चिंतन
केले तर आपले क्षुब्ध झालेले मन शांत होऊ लागते.
आदि शंकराचार्य स्वतःच्या आत्मस्वरूपाची अशी पूर्ण जाणीव झालेली असताना सुद्धा सद्गुरू
शोधत फिरत होते कारण आत्मस्वरूपाची जाणीव असणे आणि त्याचा खरोखरीच अनुभव पण
मिळणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. हा अनुभव तुम्हाला सद्गुरू कृपा झाल्याशिवाय मिळू शकत नाही.
सामान्य साधकाच्या साठी यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण साधारणपणे जातीवाद हि
मनुस्मृतीची भेट आणि जातीवाद हेच हिंदू धर्माचे मूळ स्वरूप समजतो. हे निर्वाणषटक हा तर्क खोटा
ठरवते. आणि मानव, प्राणी आणि वनस्पती सर्वात जीवात्मा आहे आणि ते सर्व अंशात्मक ब्रह्म आहेत
आणि आपले सगळ्यांचे अद्वैत आहे हा महान सिद्धांत पटवून देते आणि व्यावहारिक जगात सुद्धा
जातीभेदापासून मुक्त व्हा हे सांगते. आत्मस्वरूपाचे तत्व आत्मसात केलेला व्यक्ती सुख आणि
दुख्खाच्या क्षणी सुद्धा स्थिर राहू शकतो. तो षड्रिपू पासून मुक्त असतो त्यामुळे त्याचे अस्तित्व हे
लोकांना हवेहवेसे वाटते. संतुलित विचार आणि वर्तन याने तो लोकप्रिय होऊ शकतो. आणि आत्मभान
आलेल्या व्यक्तीची अध्यात्मिक प्रगती वेगाने होऊ लागते.
या श्लोकाच्या नित्य पठणाचा किंव्हा ऐकण्याचा अजून एक सकारात्मक परिणाम म्हणजे आपले क्षुब्ध
मन शांत करण्याचे सामर्थ्य या स्त्रोत्रात आहे. जीवात्म्याला त्याच्या सच्चिदानंद अश्या आत्मस्वरूपाचे
भान यामुळे येऊ लागते. मग आपल्याला शारीरिक आणि मानसिक पीडा देणाऱ्या गोष्टी ज्या देह अथवा
मन या स्वरूपात मीच आहे या मायेमुळे चिकटल्या असतात त्याचे पापुद्रे हळू हळू निघू लागतात आणि
आपोआप क्षुब्ध मन आणि शरीर सुद्धा निवण्याची प्रक्रिया सुरु होते. एखाद्या आजारी व्यक्तीला या
स्तोत्रामुळे मन शांत झाल्याचा अनुभव येतो. छान आणि शांत झोप लागते हा माझा स्वानुभव आहे.
©सुजीत भोगले
No comments:
Post a Comment