वरदवाणी (१)🚩
सज्जनहो !
'हिंदू
धर्म समजून घ्या' हा आजच्या व्याख्यानाचा विषय असला तरी गेली चाळीस वर्षे मी माझ्या
शक्तीप्रमाणे हिंदू धर्मच समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आलो आहे. जे काही
ग्रंथलेखन झाले त्यातही मी हाच विषय निरनिराळ्या स्वरुपात स्पष्ट केला आहे. त्यातही
कीर्तनातील पुर्वरंगाच्या 'पुर्वरंगतरंग' व 'पुर्वरंगतरंगिणी'
आणि
'वाटा आपुल्या हिताच्या' या पुस्तकांतून मी हा विषय सविस्तर मांडला आहे.
'हिंदू
धर्म समजून घ्या' या एका वाक्यात अनेक प्रश्न अंतर्भूत होतात. हिंदू धर्माचे स्वरुप
काय ? हिंदू धर्माची किंवा हिंदुत्वाची व्याख्या काय ? हिंदू
धर्माची व्यापकता किती? असे पुष्कळ प्रश्न उपस्थित होतात. स्वा. सावरकरांनी हिंदू शब्दाची जी
व्याख्या केली आहे त्यापेक्षा अधिक
लहान, अधिक चांगली आणि अर्थदृष्ट्या अधिक व्यापक व्याख्या,व्यक्तिशः
माझ्या प्रत्ययाला आलेली नाही. ते म्हणतात :
आसिंधु -सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।
पितृभूः पुण्यभूः चैव स वै हिंदुरिति स्मृतः॥
लो. टिळकांनीही हिंदू शब्दाची व्याख्या केली आहे. पण ती वैदिक
परंपरेपुरती मर्यादित आहे. ते म्हणतात :
प्रामाण्यबुद्धिवेदेषु साधनानामनेकता।
उपास्यानामनियमः हिंदुधर्मस्य लक्षणम्॥
त्यामुळे आपण आज मानतो किंवा शासन मानते त्यापेक्षा या हिंदुच्या
परंपरेचे स्वरुप वेगळे आहे. शासनाने तर हिंदूची व्याख्या न करताच हिंदू कोड बिल
मात्र पास केले आहे. लोकशाही राज्यामध्ये लोकांचा विरोध असताना, प्रत्यक्ष
राष्ट्रपतीचाही विरोध असतांना केवळ नेहरुंच्या हट्टामुळे ते बिल पास झाले. त्या
बिलामध्ये हिंदू कोणाला म्हणावे याचे गमतीचे वर्णन आहे. जे ख्रिश्चन, मुसलमान,
पारशी,
ज्यू
यांच्या व्यतिरिक्त आहेत त्यांना हे बिल लागू होईल. ज्या देशामध्ये हिंदू समाज
बहुसंख्य आहे, त्या हिंदू समाजाला, त्याची स्वतःची ओळख सांगणारी व्याख्या नसणे हे
आपल्या समाजाचे दुर्दैव आहे.
स्वा.
सावरकरांसारख्या थोर पुरुषांनी केलेली हिंदूची व्याख्या ही शासनाला मान्य करावीशी
न वाटणे हे शासनाचे दुर्दैव आहे. 'हिंदू धर्म समजून घ्या' अशा विषयावर
आजही व्याख्यानमाला आयोजित कराविशी वाटत असेल तर हीही परिस्थिती फार चांगली आहे
असे म्हणता येणार नाही. आता अलीकडे एका लहानशा गटात आपण हिंदू आहोत किंवा हिंदू
आहोत असे म्हणणे गर्वाचे आहे, अभिमानाचे आहे, अशा घोषणा
केल्या जातात. एरवी हिंदू म्हणवून घेणे हे हिंदू समाजातीलच लोकांना लाजिरवाणे वाटत
असते. राजकीय क्षेत्रात तर ते तसे होतेच. त्याची आज कारणमीमांसा करण्याचे आपल्याला
काही कारण नाही.
(क्रमशः)
[हिंदू धर्म समजून घ्या]
प.पू.ब्र.स्वामी वरदानंद भारती
No comments:
Post a Comment